पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
कृषि
बैंगन
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
24 Mar
Follow

वांगे पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in Brinjal)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

वांग्याची लागवड ही वर्षभर सर्व हंगामात म्हणजेच खरीप, रब्‍बी आणि उन्हाळ्यातही करता येते. वांग्याचे मूळस्थान भारत असून, बहुतेक सर्वचं राज्यांत त्याची लागवड केली जाते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. या पिकात तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पीक आणि तण यांच्यामध्ये विविध पोषक घटकांसाठी स्पर्धा होते. पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने उत्पादनात देखील घट येते. त्यासाठी पीक तण विरहित ठेवणे आवश्यक असते. आपण आजच्या आपल्या लेखात वांग्याचे पीक तण विरहित कसे ठेवायचे याविषयी जाणून घेणार आहोत.

लागवडीनंतर पीकवाढीच्या सुरुवातीचा एक तृतीयांश काळ हा अतिसंवेदनशील मानला जातो. या काळात अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी बाबींसाठी पीक आणि तणांची मोठी स्पर्धा होते. या काळात पीक तणविरहित न ठेवल्यास वांग्याचे उत्पादन सुमारे 90 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता असते. त्यामुळे वांगी पिकात एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

वांगी पिकात आढळणारी तणे (Weeds in Brinjal crop):

1) खरीप हंगाम:

तांदुळजा, रेशीमकाटा, नागरमोथा, केना, कोंबडा, हराळी, माका, सावन, जंगली राई, आणि हजारदाणी व इत्यादी.

2) रब्बी हंगाम:

रानकांदा, चंदनबटवा, हराळी, नागरमोथा, दुधी, रानवांगी इ.

एकात्मिक तणनियंत्रण पद्धती:

प्रतिबंधात्मक उपाय:

  • शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
  • पीक पेरणीपूर्वी शेतात उगवलेली तणे काढून टाकावीत.
  • पेरणीसाठी तणविरहित बियाणे वापरावे.
  • शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे लक्ष देणे. त्यामुळे कीड-रोगांच्या पुढील प्रसारास आळा बसेल.
  • वांग्‍याच्‍या पिकात खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतरमशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्‍यक आहे.
  • त्‍याकरिता आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्‍यावे.
  • तसेच झाडास मातीची भर द्यावी.
  • वांगी पिकाचा संवेदनशील काळ हा लागवडीनंतर 20 ते 60 दिवस व उत्पन्नातील घट 70 ते 80 टक्के एवढी असते.

तण व्यवस्थापन तंत्र:

  • मल्चिंग ही शेतातील तण नियंत्रणाची प्रगत पद्धत आहे.
  • मल्चिंग म्हणजे शेतात लावलेल्या झाडांच्या मातीला चारही बाजूंनी प्लास्टिकचे आच्छादन लावणे. या तंत्रामुळे पीक दीर्घकाळ तणांपासून सुरक्षित राहते.
  • कुदळाच्या साहाय्याने वेळोवेळी तण काढणे ही पिकातील तण नियंत्रणाची सर्वात पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे.
  • पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत किंवा ठराविक अंतराने शेतातील तण काढणे आवश्यक आहे.
  • तण 1 ते 6 इंचाचे असतांना पॅराक्वॅट डिक्लोराईड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) 800 ते 1000 मिली / एकर फवारणी करावी किंवा
  • ऑक्सीफ्लोरफेन 23.5% ईसी (डाऊ-गोल) एकरी 120 मिलीची 400 लिटर पाण्यातून ओलसर जमिनीत फवारणी करावी.
  • या तणनाशकांचा उपयोग शेतातील तणांची संख्या कमी करण्यासाठी, एकतर ब्रॉडकास्ट स्प्रे म्हणून किंवा वांग्याच्या लागवडीपूर्वी उगवलेल्या आणि वाढणाऱ्या तणांवर उपचार म्हणून केला जाऊ शकतो.
  • तसेच ग्लायफोसेट 41% एसएल (देहात-MAC7) चा 800 ते 1200 मिली प्रति एकर याप्रमाणात देखील तण नष्ट करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

वांगी पिकावर तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी:

  • कमीत कमी वांगी एक महिन्याची असावी. जेणेकरून पिकाच्या वाढीवर तणनाशकांचा परिणाम होणार नाही.
  • पिशव्यांनी पीक झाकून घावे यामुळे वांग्याला हानी पोहोचणार नाही.
  • पिशव्यांनी झाड झाकून घ्यावे.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

तुम्ही वांगी पिकाचे तणांपासून कसे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. वांग्याची लागवड कोणत्या हंगामात करता येते?

वांग्याची लागवड ही वर्षभर सर्व हंगामात म्हणजेच खरीप, रब्‍बी आणि उन्हाळी हंगामात देखील करता येते

2. वांग्याच्या पिकात हंगामानुसार कोणती तणे आढळून येतात?

वांग्याच्या पिकात खरीप हंगामात तांदुळजा, रेशीमकाटा, नागरमोथा, केना, कोंबडा, हराळी, माका, सावन, जंगली राई, आणि हजारदाणी व इत्यादी. तर रब्बी हंगामात रानकांदा, चंदनबटवा, हराळी, नागरमोथा, दुधी, रानवांगी इ. तणे आढळून येतात.

3. वांग्याच्या पिकात तण वाढल्यास पिकाचे किती नुकसान होते?

वांग्याच्या पिकात तण वाढल्यास वांग्याचे उत्पादन सुमारे 90 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता असते.

21 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ