तपशील
ऐका
राजमा
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
1 year
Follow

राजमा लागवड तंत्र

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

राजम्याला श्रावण घेवडा देखील म्हंटले जाते. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी राजमा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये राजम्याची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 31050 हेक्‍टर क्षेत्रावर राजम्याची लागवड होते.

लागवड हंगाम:

महाराष्‍ट्रात या भाजीपिकाची लागवड तीनही हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्‍यात रब्‍बी हंगामासाठी सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात राजम्याची लागवड करतात.

जमिन व हवामान:

मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत राजमा पीक चांगले वाढते. आम्लधर्मी किंवा चोपण जमिनीत हे पीक घेणे टाळावे. जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्‍या दरम्‍यान असावा. थंड ,समशीतोष्ण हवामान या पिकास मानवते. 70 - 80 सें.मी पर्यंत पाऊसमान असलेल्या भागात हे पीक चांगले येते. पिकाच्या वाढीस 16 - 24 डी. सें. ग्रे. तापमान लागते. हे पीक धुके, जास्त पाऊस, जास्त काळ हवामानातील आर्द्रता यास संवेदनशील आहे.

पूर्व मशागत:

पिकाच्या लागवडीसाठी खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मध्यम खोल नांगराने नांगरट करून ढेकळे फुटल्यानंतर हेक्टरी 20 - 25 बैलगाड्या शेणखत घालून वखराच्या आडव्या उभ्या दोन - तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

वाण:

  • कंटेडर
  • पुसा पार्वती
  • अर्का कोमल
  • वाघ्या
  • फुले सुरेखा

बीजप्रक्रिया:

जर्मिनेटर 25 मिली + प्रोटेक्टंट 10 ग्रॅम प्रति लि. पाण्यात घेऊन बियाणे 5 ते 10 मिनिटे भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणी करावी. म्हणजे बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टळून उगवण लवकर व अधिक प्रमाणात होईल.

लागवड पद्धती:

पाभर किंवा तिफणीने पेरणी:

खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्‍यावर, जमिन वाफश्‍यावर आल्‍यावर करावी. या पद्धतीने केल्यास दोन ओळीत 45 सेमी अंतर ठेवतात. अशा वेळी एकरी 15 किलो बियाणे लागते. हलक्या जमिनीत दोन ओळीत 30 सेमी अंतर तर दोन झाडात 10 सेमी अंतर ठेवतात.

टोकण पद्धत:

उन्हाळी हंगामात बियांची पेरणी टोकण पद्धतीने केल्यास 30 सेमी वर बिया टोचतात. या पद्धतीत एकरी 10 किलो बियाणे लागते. टोकण पद्धतीमध्ये 2/3 सेमी खोलवर बिया टोचाव्या लागतात. सुमारे 45 ते 60 दिवसांनी शेंगा तोडणीस येतात. एकूण 4/5 तोडे होतात, तर एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन निघते.

खत व पाणी व्यवस्थापन:

  • राजमा पिक जमिनीत असणारे स्फुरद, पालाश, नत्र अशी मुख्य अन्नद्रवे शोषून घेतात.
  • राजमा पिकास प्रति एकरी 16 टन शेणखत, 20 ते 44 किलो पालाश, 20 ते 21.6 किलो नत्र, 20 ते 40 किलो स्फुरद द्यावे लागते.
  • राजमा पिकाला फुले येण्याआधी पाणी दिले पाहिजे.
  • पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घेतली पाहिजे.
  • खरीप हंगामात पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही परंतु पाऊस नसल्यास गरजेनुसार पाणी दिले गेले पाहिजे.
  • उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी दिले पाहिजे.

आंतरमशागत:

  • खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्‍यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी.
  • खरीप हंगामात तणांचा योग्‍य वेळी बंदोबस्‍त करणे आवश्‍यक आहे.
  • 1 ते 2 खुरपण्‍या देऊन तण काढावे किंवा पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करावी.
  • खरीप हंगामात जास्‍त प्रमाणात पाऊस झाल्‍यास आणि योग्‍य प्रमाणात पाण्‍याचा निचरा न झाल्‍यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

हंगामाच्या अखेरीस वाळलेल्या शेंगा काढून,मोगरीने झोडल्यास दाणे निघतात. एकरी ५ / ७ क्विंटल दाण्यांचे उत्पादन होते.

अशाप्रकारे योग्य पद्धतीने लागवड केल्यास तुम्हाला देखील राजमा लागवडीतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो. आम्हाला आशा आहे की ही माहिती आपल्याला फायदेशीर ठरेल. याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

  • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/pSRsC5nrAEb
  • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre

61 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor